१५ मार्च हा ‘कोटक महिंद्रा’चे मुख्य संचालक उदय कोटक यांचा जन्मदिन. तसेच, सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ. राही मासूम रझा यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय... ...........
उदय कोटक
१५ मार्च १९५९ रोजी उदय कोटक यांचा जन्म झाला. पाकिस्तानातून भारतात आलेले कोटक कुटुंब कापड बाजारपेठेतील मोठे व्यापारी होते. त्या वेळी त्यांचे परदेशी व्यावसायिकांशी संबंध होते. उदय यांचे काका आणि धीरूभाई अंबानी यांची मैत्री होती. काकांचे पोलंडमध्ये कार्यालय होते. निर्यात व्यवसायामध्ये असलेले काका व धीरूभाई पोलंडला जात होते तेव्हा सोबतच थांबत होते. उदय यांना कॉन्व्हेन्टमध्ये प्रवेश देण्याइतपत कुटुंबाची आर्थिक संपन्नता होती. मात्र, वडील गांधीवादी होते. त्यामुळे शिक्षण हिंदी विद्याभवनमध्ये झाले. त्यांच्या शाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केले होते.
उदय यांना नंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथेही त्यांनी चमक दाखवली. क्रिकेट आणि सतारची आवड असणाऱ्या उदय यांना १९७९मध्ये क्रिकेट खेळताना चेंडू डोक्याला लागला. डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये वर्ष वाया गेले. मात्र, त्यानंतर दिलेल्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात त्यांनी अव्वल क्रमांक पटकावला. पुढे जमनालाल बजाज कॉलेजमधून एमबीए केले. मुंबईच्या फोर्ड भागातील नवसारी इमारतीमध्ये त्यांचे वडिलोपार्जित कार्यालय होते. उदय तिथे नियमित जाऊ लागले. मात्र, ते तिथे रमले नाहीत.
त्यांना कापड व्यवसाय सोडून हिंदुस्तान लिव्हरमध्ये नोकरी करण्याची इच्छा झाली. नोकरीतून काही साध्य होणार नाही, असा सल्ला वडिलांनी त्यांना दिला. त्यावर उदय म्हणाले, ‘एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या व्यवसायात काम करताना प्रत्येक निर्णयासाठी प्रत्येकाची संमती घ्यावी लागते, त्यामुळे मी काम करू शकत नाही.’ वडिलांनी विचारले, ‘मग तुला काय हवे आहे?’ उदय म्हणाले, ‘मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.’
त्याच कार्यालयात ३०० चौरस फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्या वेळी टाटाची एक कंपनी असलेल्या ‘नेल्को’ची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीशी त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८०मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्रोत मिळाले.
१९८५ मध्ये नशीब फळफळल्याची त्यांची भावना आहे. ग्रिंडलॅजच्या सिडनी पिंटोनी स्वत:चा वित्त व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. याच वर्षी आनंद महिंद्रा यांच्याशीही चर्चा झाली. त्यांच्या अगीन महिंद्रासाठी उदय यांनी वित्त पुरवठा केला होता. आनंद यांनीही त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी आनंद महिंद्रा यांच्या मदतीने १९८६मध्ये ३० लाख रुपयांत कंपनी सुरू केली. ‘कोटक महिंद्र’ची सुरुवात अशा पद्धतीने झाली.
अनिल अंबानी यांच्या लग्नात उदय यांची भेट एफडी व्यवसायाची संकल्पना संपुष्टात आणू पाहणाऱ्या एका मित्राशी झाली. उदय यांनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. दलाल स्ट्रीटवर कार्यालय घेतले आणि पाच वर्षांत कोटक महिंद्र मर्चंट बँकिंगमध्ये आली. १९९१मध्ये कंपनीचा पब्लिक इश्यू आला. यानंतर उदय यांनी गोल्डमन सॅकच्या हेंग पॉलसनसोबत करार केला.
.....
डॉ. राही मासूम रझा एक ऑगस्ट १९२७ रोजी डॉ. राही मासूम रझा यांचा उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे जन्म झाला. डॉ. राही मासूम रझा यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पीएचडी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्यकृतींबरोबरच ते हिंदी सिनेमाशी जोडले गेले.
डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शनसाठी १००हून अधिक मालिका त्यांनी लिहिल्या. त्यातील ‘महाभारत’ और ‘नीम का पेड़’ या अविस्मरणीय होत्या. ‘महाभारत’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ. राही मासूम रझा यांनी काम केले. ‘महाभारत’ बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी ‘बीआर’च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं.
बी. आर. चोप्रा यांनी ‘महाभारत’ची कल्पना डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली, त्यानंतर केवळ चोवीस तासांतच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन ते चोप्रांकडे आले. इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ. राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत.
चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, तसेच कविताही लिहिल्या आहेत. ‘नीम का पेड़’ या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाँव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. ‘तिलिस्म-ए-होशरुबा’ हा त्यांचा कथासंग्रह आहे.
आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी त्यांची ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मश्री’ , पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमॅटोग्राफर आहेत. डॉ. राही मासूम रझा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले.
माहिती संकलन : संजीव वेलणकर